प्रस्तावना
आंबेडकरी चळवळीतील एक महत्वपूर्ण आयाम म्हणजे मंदिरप्रवेश सत्याग्रह
होय. तत्कालीन समाजव्यवस्थेने दलितांना अस्पृश्य मानून सर्व मानवी अधिकार नाकारले
होते. त्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता, राजकीय
संस्थांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार नव्हता, शाळा-महाविद्यालयात शिकण्याचा अधिकार
नव्हता, मंदिरात जावून देवदर्शन व पूजाअर्चना तर दूर पण मंदिरात प्रवेश करण्याचा
सुद्धा त्यांना अधिकार नव्हता.
मंदिरप्रवेश सत्याग्रह का?
अशा विषमतावादी
वातावरणात “जोपर्यंत आम्ही स्वताला हिंदू म्हणवीत आहोत व
तुम्ही आम्हास हिंदू समजत आहात तोपर्यंत देवळात जावून देवदर्शन घेणे हा आमचा हक्क
आहे असे आम्ही समजतो.” अशी परखड भमिका घेवून आंबेडकरांनी मंदिरप्रवेश
सत्याग्रहांची साखळीच निर्माण केली. काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह, पर्वती
मंदिरप्रवेश सत्याग्रह इ. आंबेडकरी चळवळीतील उल्लेखनीय सत्याग्रह असले तरी, या
मंदिरप्रवेश सत्याग्रहांची सुरुवात अमरावतीच्या अंबादेवी मंदिरप्रवेश
सत्याग्रहापासून झाली त्यामुळे अंबादेवी मंदिरप्रवेश सत्याग्रहास आंबेडकरी चळवळीत
अनन्यसाधारण महत्व आहे.
अंबादेवी मंदिरप्रवेश सत्याग्रहाची पार्श्वभूमी
अमरावतीतील अंबादेवी मंदिर हे
इतिहास प्रसिद्ध आहे. याच मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते अशी
आख्यायिका महाभारतात आहे. हिंदू धर्मातील लोक दूरदुरून अंबादेवीच्या दर्शनास येत
असत परंतु दलितांना मात्र या मंदिरात प्रवेश नव्हता. दलितांना अंबादेवी मंदिरात
प्रवेश मिळावा यासाठी महार जातीतील गोविंदराव मेश्राम यांनी अंबादेवी मंदिर पंचकमेटीकडे
विनंती अर्ज पाठवून अंबादेवी मंदिरप्रवेश सत्याग्रहास प्रारंभ केला असला तरी अनेक महारेतर मंडळींनी
सुद्धा हा सत्याग्रह यशस्वी होण्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष केला. अस्पृश्य
महार मंडळींनी मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह करणे हे त्यांच्या सामाजिक समतेच्या
दृष्टीकोनातून सहाजिक होते. परंतु दलित-अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून
मानापमानाची पर्वा न करता स्पृश्य महारेतरांनी या सत्याग्रहात जे अभूतपूर्व योगदान
दिले ते त्यांच्या पुरोगामित्वाचे प्रतिकच म्हणावे लागेल. गोविंदराव मेश्राम यांचा
विनंती अर्ज अंबादेवी मंदिर पंचकमेटीने फेटाळल्यामुळे १९२६ मध्ये संपतराव नाईक
यांनी काही पुरोगामी महारेतरांच्या मदतीने परत एकदा कमेटीकडे दलितांच्या
मंदिरप्रवेशासाठी अर्ज केला. परंतु ह्यावेळी सुद्धा कमेटीने प्रतिकूलता दर्शविली
त्यामुळे दलित समाजात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले. अशावेळी दादासाहेब बागवे
या सुधारकी मराठ्याने पुढाकार घेवून आपल्या राहत्या घरी दादासाहेब पाटील
यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेवून अंबादेवी
मंदिर पंचकमेटीकडे मंदिरप्रवेशासाठी पुन्हा अर्ज पाठविण्याचा ठराव केला. शिवाय
कमेटीने यावेळी अनुकूल प्रतिसाद दिला नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा
दिला.
अंबादेवी मंदिरप्रवेश सत्याग्रह समिती
दादासाहेब बागवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे
दलितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परंतु अंबादेवी मंदिर पंचकमेटीने
मात्र अस्पृश्यांना कोणत्याही परिस्थितीत मंदिरप्रवेश दिला जाणार ही आपली ताठर
भूमिका सोडली नाही. तेंव्हा अस्पृश्यांनी सत्याग्रह करण्याचा ठाम निर्धार केला. सत्याग्रहाचे
यशस्वी नियोजन करण्यासाठी सत्याग्रह समिती स्थापन करण्यात आली. या समितीत पुरोगामी
महारेतर हिरीरीने सहभागी झाले. विदर्भातील एक कृतीशील मराठा पुढारी, आंबेडकरांचे
निकटचे सहकारी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मोठ्या उत्साहाने समितीचे अध्यक्षपद
स्वीकारले. व्ही. बी. चौबळ, रावसाहेब दिवे, दादासाहेब पाटील, दलपतसिंह चव्हाण, तथा
नानासाहेब अमृतकर इत्यादी महारेतर मंडळी सदस्य म्हणून सत्याग्रह समितीत सहभागी
झाली. अंबादेवी मंदिरप्रवेश सत्याग्रहाविषयी जनजागृती होण्यासाठी सत्याग्रह समितीने
संपूर्ण अमरावती जिल्हा पिंजून काढून चांदूरबाजार, थुंगाव, एलीचपूर, इत्यादी
ठिकाणी सभा घेवून अस्पृश्यवर्गामध्ये जनमत निर्माण केले. एवढेच नाहीतर पुरोगामी
वृत्तीच्या स्पृश्य महारेतरांना या सत्याग्रहाविषयी अनुकूल बनविण्यात सुद्धा समिती
यशस्वी झाली. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आपल्या अध्यक्षतेखाली तालुका सत्याग्रह
परिषदा घेवून. स्पृश्य बहुजन समाजाला अंबादेवी मंदिरप्रवेश सत्याग्रहाविषयी वस्तुस्थितीची जाणीव
करून दिली. त्यामुळे अनेक पुरोगामी स्पृश्य मंडळींनी सत्याग्रहास आपला पाठींबा
जाहीर केला.
अस्पृश्य समाजाची सभा
अस्पृश्य समाजाच्या मंदिरप्रवेशाच्या न्याय्य
हक्कासाठी अमरावती येथे नेकोलेट पार्कवर दि. २८ ऑगस्ट १९२७ रोजी बॅ. नानासाहेब
तिडके यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेस डॉ. पंजाबराव देशमुख, एस.
वाय. पाटील, नानासाहेब अमृतकर, वामनराव घोरपडे, दलपतसिंह चव्हाण इत्यादी महारेतर
मंडळी उपस्थित होती. इतकेच नाहीतर डॉ. पटवर्धन (शिवाजीराव?) सारखी ब्राह्मण
जातीतील काही व्यक्तीसुद्धा सभेस आली होती. या सभेत पटवर्धनांनी एक तडजोडीचा मार्ग
सुचविला. “हिंदुंची मने न दुखवता कार्यभाग साधावा याकरिता
एक कमिटी नेमून तिच्या तिच्या मार्फत मंदिर पंचकमेटीची समजूत घालावी व हिंदूंची
मने वळवावी यासाठी एक महिन्याचा अवधी द्यावा आणि सकारात्मक चिन्हे न दिसल्यास
सत्याग्रह पुकारावा.” पटवर्धनांनी मांडलेली ही सूचना अतिशय महत्वाची
होती. स्पृश्य-अस्पृश्यांत मतभेद होवून दुही निर्माण होण्यापेक्षा सामंजस्याने
मंदिरप्रवेशाचा प्रश्न सुटल्यास चांगलेच होते. त्यामुळे सभेने पटवर्धनांच्या
सूचनेचे स्वागत करून सत्याग्रह एक महिन्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या
काळात अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशासाठी डॉ. पटवर्धनांनी स्पृश्य हिंदूंची मने
वळविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु आपल्या कार्यात ते अपयशी ठरल्यामुळे
अस्पृश्यांसमोर सत्याग्रहाशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.
पुरोगामी महारेतरांचा दृढनिश्चय
अस्पृश्यांच्या
मंदिरप्रवेश सत्याग्रहासाठी डॉ. पंजाबराव देशमुखांसारखे स्पृश्य सुधारक
मानापमानाची पर्वा न करता कसोशीने कार्य करीत आहेत. किंबहुना त्यांच्याच
प्रयत्नामुळे अस्पृश्यांचा अंबादेवी मंदिरप्रवेश सत्याग्रह वाटचाल करीत होता.
तेंव्हा त्यांनाच सत्याग्रहापासून दूर करण्याचा कट हिंदू धर्मातील काही सनातनी
कर्मठ स्पृश्य मंडळींनी केला. मराठा हायस्कूलचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख आणि
सुपरीटेंडेट गोपाळराव देशमुख हे आपल्या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना जोरजबरीने
अस्पृश्यांच्या चळवळीत सहभागी करून घेतात. अशी तक्रार त्यांनी मराठा हायस्कूलचे
आधारस्तंभ अप्पासाहेब देशमुख यांच्याकडे केली. यावर
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी २८ ऑगस्ट १९२७ च्या सभेत “अस्पृश्यांच्या चळवळीत भाग घेतल्याने जर मराठा
हायस्कूल बंद पडणार असेल तर त्याची आम्हा तत्त्वनिष्ठ लोकांना पर्वा नाही.” असे सडेतोड उत्तर दिले. यावरून
डॉ. पंजाबराव देशमुख व गोपाळराव देशमुख यांना सनातनी स्पृश्य मंडळींनी किती
मनस्ताप दिला याची कल्पना येते. आणि सर्व मनस्ताप, मानापमान सहन करून डॉ. पंजाबराव
देशमुख व गोपाळराव देशमुख आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यावरून त्यांच्या
अस्पृश्यांप्रती असलेल्या बांधिलकीची सुद्धा जाणीव होते. दरम्यानच्या काळात मांगोजी
महार या अस्पृश्य व्यक्तीने अंबादेवी मंदिरात प्रवेश केल्यामुळे न्यायालयाने
त्याला एक महिन्याची शिक्षा ठोठावली असता पेशाने वकील असलेल्या डॉ. पंजाबराव
देशमुखांनी न्यायालयात मांगोजीच्या वतीने युक्तिवाद करून त्याची निर्दोष सुटका
केली. यामुळे अस्पृश्य समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
स्पृश्य हिंदूंची सभा
अंबादेवी मंदिरप्रवेश चळवळीचा वाढता प्रसार पाहून मंदिर पंचकमेटीने हनुमान
व्यायाम शाळेत दि. २३ सप्टेबर १९२७ रोजी स्पृश्य हिंदूंची एक सभा घेतली. या सभेस
उपस्थित सर्व स्पृश्यांनी अंबादेवी मंदिर पंचकमेटीने केलेल्या ठरावास पाठींबा
दिला. यावर हनुमंतराव देशमुख यांनी मात्र हरकत घेवून, “अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाच्या
प्रश्नावर सामाजिक दृष्टीने विचार केला पाहिजे. ख्रिश्चन आणि मुसलमान लोक
ज्याप्रमाणे एकाच देवळात जातात. त्याप्रमाणे आपणही एकाचा देवळात गेले पाहिजे.” असे
परखड मत व्यक्त केले. देशमुखांच्या सडेतोड सुधारकी भूमिकेमुळे सनातन्यांनी गोंधळ
करून विरोध दर्शविला. शेवटी सभेने अस्पृश्यांना अंबादेवी मंदिरात प्रवेश दिल्या
जाणार नाही असे जाहीर केले. सभेत सर्वत्र विरोध असताना देशमुखांनी अस्पृश्यांच्या
मंदिरप्रवेशासाठी जी कणखर वृत्ती दाखविली ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे.
तीन कलमी योजना
अंबादेवी मंदिरप्रवेश सत्याग्रहामुळे स्पृश्य हिंदु धर्मियांमध्ये अनुकूल व
प्रतिकूल असे दोन गट निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत त्यांच्यात तडजोड करून
सर्वसंमत मार्ग काढणे अतिशय गरजेचे होते. तेंव्हा बॅ. बागवे यांनी पुढाकार घेवून रावसाहेब
रणदिवे व विठ्ठल बंधुजी चौबळ यांच्या मदतीने एक तडजोडीची तीन कलमी योजना तयार
केली. या
योजनेनुसार -
१. अंबादेवीच्या भोवताल एक कठडा बांधावा, अस्पृश्यांना या कठड्यापर्यंत प्रवेश दयावा.
१. अंबादेवीच्या भोवताल एक कठडा बांधावा, अस्पृश्यांना या कठड्यापर्यंत प्रवेश दयावा.
२. दिवसाच्या काही विशिष्ट वेळी सर्वाना मंदिरात
प्रवेश असावा.
३. वर नमूद केलेल्या वेळी अस्पृश्यांनी मंदिरात
प्रवेश करू नये.
असे ठरविण्यात आले. ही योजना सादर करून बागवे,
रणदिवे, चौबळ इ. स्पृश्य महारेतर मंडळींनी स्पृश्य-अस्पृश्यांमध्ये तडजोड घडवून
आणण्याचा प्रयत्न केला. परंतु या योजनेमुळे अस्पृश्यांच्या समतेच्या तत्वास तडा
गेला असता म्हणून सत्याग्रह समितीने ही योजना नाकारून कोणत्याही परिस्थितीत अंबादेवी
मंदिरप्रवेश सत्याग्रह यशस्वी करण्याचा निर्धार केला.
वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषद
अंबादेवी मंदिरप्रवेश
सत्याग्रह चळवळ गतिशील करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुढाकाराने अमरावती
येथे दि. १३-१४ नोव्हेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली
वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषद आयोजित करण्यात आली. देवराव नाईक, सीताराम
शिवतरकर, रा. दा. कांबळी, द. वी. प्रधान इ. आंबेडकरांचे महारेतर सहकारी
त्यांच्यासोबत खास सत्याग्रहासाठी मुंबईहून अमरावतीला आली होती. तर अमरावतीतील डॉ.
पंजाबराव देशमुख, बॅ. नानासाहेब तिडके, चौबळ वकील, केशवराव देशमुख, डॉ. पटवर्धन इ.
पुरोगामी वृत्तीची महारेतर मंडळी सुद्धा या परिषदेत सक्रीय सहभागी झाली होती. डॉ.
पंजाबराव देशमुख यांनी प्रास्ताविक करून अंबादेवी मंदिरप्रवेश सत्याग्रहाचे महत्व
उपस्थितांना समजावून सांगितले. अंबादेवी मंदिर पंचकमेटीचे अध्यक्ष गणेश श्रीकृष्ण उपाख्य
दादासाहेब खापर्डे यांनी या परिषदेसाठी एक पत्रसंदेश पाठविला होता. त्यानुसार
त्यांनी अस्पृश्यांच्या अंबादेवी मंदिरप्रवेशासाठी तडजोड करण्याची तयारी दर्शवून
सनातनी हिंदूंच्या मतपरिवर्तनाकरीता तीन महिन्याचा अवधी मागितला. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या आगमनाने अंबादेवी मंदिरप्रवेश सत्याग्रह चळवळीत नवचैतन्य निर्माण
झाले. तर सनातनी स्पृश्य मंडळींचे धाबे दणाणले. त्यामुळे त्यांनी सुद्धा नाईलाजास्तव
अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशासाठी अनुकुलता दाखविण्यास सुरुवात केली.
सनातनी स्पृश्यांची बदलती भूमिका
दादासाहेब खापर्डे यांनी
सनातनी स्पृश्य हिंदूंची मनोधारणा बदलविण्यासाठी तडजोडीचे प्रयत्न सुरु केले. त्या
प्रयत्नाचा एक भाग म्हणून रावबहादूर बह्म यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवून एक मंडळ
स्थापन करण्यात आले. या मंडळाच्या माध्यमातून अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशासाठी
अनुकूल वातावरण तयार करण्याचे प्रयत्न देखील सुरु करण्यात आले. दि. २१ सप्टेबर
१९३२ रोजी दादासहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली वाईचे पंडित दिवेकरशास्त्री
यांचे व्याख्यान आयोजित करून सनातनी स्पृश्य मंडळीचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयास
करण्यात आला. एकीकडे रावबहादूर ब्रह्म आणि दादासाहेब खापर्डे मंदिर पंचकमेटीशी
चर्चा करून अस्पृश्यांच्या अंबादेवी मंदिरप्रवेशाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
करीत होते तर दुसरीकडे वीर वामनराव जोशी, दिवेकरशास्त्री, पी. वाय. देशपांडे, सौ.
विमलाबाई देशपांडे, गुलाबराव बक्षी, डॉ. सबनीस इत्यादी मंडळी सभा, पत्रके,
स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून जनमत जागृत करण्याचा प्रयत्न करीत होते. अशाप्रकारे
अनुकूल वातावरण तयार झाल्यावर दादासहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखालील दि. २५
सप्टेबर १९३२ च्या सभेत अस्पृश्यांच्या अंबादेवी मंदिरप्रवेशाचा ठराव प्रचंड
बहुमताने पारित करण्यात आला. दि.
२८ सप्टेबर १९३२ रोजी पंचकमेटीने अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. तर
अमरावती महानगरपालिकेने दि. ८ ऑक्टोबर १९३२ रोजी अंबादेवी मंदिरप्रवेशाचा पूरक
ठराव पारित केला.